अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत
छत्रपती संभाजीनगर:
काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना शहरातील काँग्रेस कार्यालयातून खुर्च्याही पळवल्याचा रंजक किस्सा ज्यांच्या नावाने आजही चर्चिला जातो, तेच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या ‘गांधी भवनात’ दाखल झाले आहेत. या अचानक झालेल्या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आणि नव्या राजकीय समीकरणांच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सत्तार थेट काँग्रेसच्या गांधी भवनात पोहोचले. जुन्या मित्राच्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस भवनात जाण्यात कसलाही संकोच वाटला नसल्याचे सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले. वाढदिवसाचे निमित्त असले तरी, राजकीय पार्श्वभूमी पाहता या भेटीचे वेगळेच अर्थ काढले जात आहेत.
२०२४ ची ‘कल्याण’ मदत आणि जुनी राजकीय समीकरणे
अब्दुल सत्तार आणि काळे कुटुंबातील राजकीय सलोखा नवा नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी जुने राजकीय मतभेद बाजूला ठेवत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना छुपी व उघड मदत केली होती. सत्तार आणि काळे यांच्यातील याच ‘एकमेका साह्य करू’ या समीकरणामुळे भाजप नेते रावसाहेब दानवे यांची हॅट्रीक हुकली होती, असे राजकीय विश्लेषक मानतात.
२०१९ चे ‘बंड’ अन् चंद्रकांत खैरे यांचा पराभव
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता. त्यावेळी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या राजकीय उलथापालथीमुळेच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते.
सात वर्षांपूर्वी अत्यंत नाट्यमय आणि वादग्रस्त घडामोडींनंतर काँग्रेस सोडणारे सत्तार आता पुन्हा गांधी भवनाची पायरी चढल्याने आगामी स्थानिक व राज्यस्तरीय राजकारणात नेमके कोणते नवीन वळण येणार, याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.





