दुष्काळजन्य परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगर मनपाच्या गुंठेवारी योजनेला ६ महिने मुदतवाढ द्या; डॉ. राजेंद्र दाते पाटील यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
दुष्काळजन्य परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगर मनपाच्या गुंठेवारी योजनेला ६ महिने मुदतवाढ द्या; डॉ. राजेंद्र दाते पाटील यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी योजनेअंतर्गत खुले प्लॉट आणि बांधकामे नियमानुकूल (अधिकृत) करण्यासाठीची मुदत किमान सहा महिने वाढवून द्यावी, अशी जोरदार मागणी जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये गुंठेवारी योजनेअंतर्गत घरे आणि खुले प्लॉट सवलतीच्या दरात नियमानुकूल करून घेण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. मनपा प्रशासनाने यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंत दिलेली मुदत वाढवून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंतच केली आहे. तसेच १ नोव्हेंबर २०२६ पासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून घरे पाडण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून गोरगरीब जनतेच्या निवाऱ्याच्या हक्कावर घाला घालणारा आहे, असा आरोप डॉ. दाते पाटील यांनी केला आहे.
मनपाच्या उत्पन्नात मोठी भर
१ एप्रिल ते १५ सप्टेंबर या कालावधीत गुंठेवारी योजनेच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत तब्बल ५७ कोटी २९ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ५० टक्के सूट, १०० टक्के बेटरमेंट चार्ज माफी आणि ६० टक्के दंडमाफीमुळे नागरिकांचा या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशा वेळी योजना पूर्णपणे बंद करणे जनविरोधी ठरेल.
शासकीय निर्णयाची गरज
नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि मनपाच्या उत्पन्नात भर पाडण्यासाठी जुन्याच सवलतीच्या दरांनुसार किमान सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे आदेश नगरविकास खात्याने तात्काळ काढावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात येत असल्याचे डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी स्पष्ट
केले.






