ग्रामसभा वाचवा! वाघोळ्यातून महाराष्ट्रव्यापी आंदोलनाची वज्रमूठ
१५ मागण्यांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी विकास गायकवाड, श्रीमंत गायकवाड व ग्रामस्थांचे आमरण उपोषण
वाघोळा-पोफळा ग्रामपंचायतीच्या कामांच्या चौकशीसह ऑनलाइन पारदर्शकतेची मागणी
फुलंब्री (विशेष प्रतिनिधी): दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
ग्रामसभा ही ग्रामविकासाची खरी लोकशाही व्यवस्था आणि गावकऱ्यांच्या हक्काचे व्यासपीठ असून तिचा अधिकार अबाधित राहिलाच पाहिजे, या मुख्य उद्देशाने ‘ग्रामसभा वाचवा – महाराष्ट्रव्यापी आंदोलन’ पुकारण्यात आले आहे. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून वाघोळा (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे विकास शेषराव पाटील गायकवाड, श्रीमंत साहेबराव पाटील गायकवाड व स्थानिक ग्रामस्थांनी १५ प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली.
आंदोलनाची सुरुवात श्री गणराय, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
लोकसभेच्या धर्तीवर पूर्वसूचनेची व्यवस्था करा
ग्रामसेवक संघटनेच्या आंदोलनामुळे ग्रामसभांवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी स्पष्ट केले की, लोकसभेत खासदार आणि विधानसभेत आमदारांना प्रश्न विचारण्यासाठी जशी पूर्वसूचनेची पद्धत असते, त्याच धर्तीवर ग्रामस्थांनी ग्रामसभेत विचारावयाचे प्रश्न काही दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करण्याची व्यवस्था करण्यात यावी. यामुळे प्रशासनाला तयारी करून उत्तर देणे सोपे होईल आणि ग्रामसभा अधिक शिस्तबद्ध व परिणामकारक होईल.
प्रमुख मागण्या:
* ग्रामसभेत निधी, खर्च आणि विकासकामांची माहिती पारदर्शकपणे मांडणे.
* ग्रामसभेच्या ठरावांवर काय कारवाई झाली, याची माहिती ऑनलाइन व ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करणे.
* ग्रामपंचायतींचे नियमित सामाजिक लेखापरीक्षण (सोशल ऑडिट) करणे.
* ग्रामसेवकांच्या कामकाजासाठी स्वतंत्र व वेळबद्ध तक्रार निवारण व्यवस्था उभारणे.
* कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी व त्यानुसार वेतन प्रणाली लागू करणे.
* वाघोळा-पोफळा ग्रुप ग्रामपंचायतीतील विकासकामे व निधीच्या वापराची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करणे.
“ग्रामसभा ही कोणत्याही एका पक्षाची किंवा गटाची नसून प्रत्येक गावकऱ्याची लोकशाही संस्था आहे. हा लढा केवळ वाघोळ्यापुरता नसून संपूर्ण महाराष्ट्रातील गावांच्या हक्कासाठी आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील,” असा निर्धार विकास गायकवाड यांनी व्यक्त केला.
या महाराष्ट्रव्यापी आंदोलनाला राज्यातील सर्व नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी शांततामय मार्गाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन विकास पाटील गायकवाड व सचिन श्रीमंत पाटील गायकवा
ड यांनी केले आहे.






