Mahayuti Government Collapse Valmik Karad Claim: बुलढाण्यातील चिखला गावातील घटनेवरून वातावरण तापले असताना मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरून महायुती सरकार कोसळण्याचा इशारा दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडने जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर जरांगे म्हणाले, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बाहेर राहू शकत नाहीत, तो कोर्टात गेला काय आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जरी गेला तरी त्याला सुट्टी नाही. जामीन मंजूर झाल्यास सरकार टिकेल का, असा इशाराही त्यांनी दिला. ज्या दिवशी वाल्मीक कराडचा जामीन होईल त्याच दिवशी सरकार पडेल, असा दावा त्यांनी केला.
याशिवाय काही जण गुंडगिरी, बोगस लाभार्थी आणि राजकीय फायद्यासाठी काम करत असून त्यामुळे समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित टोळीमुळे जात बदनाम होत असल्याचे सांगत समाजाने अशा प्रवृत्तींपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेलाही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्या निधनाची सर्व कुटुंबाला शंका असल्यास सखोल तपास व्हायलाच हवा. मात्र, गमावलेला व्यक्ती परत येणार नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले. जामीन, पीकविमा आणि इतर प्रकरणांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महादेव मुंडे आणि सहआरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
