कुंभारझरी येथील वारकरी धर्म संकिर्तन सेवा प्रतिष्ठानला निर्मल दिंडी पुरस्कार २०२६जाहीर.
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
जाफराबाद प्रतिनिधि : मोहम्मद बाईयाश
जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील वारकरी धर्म संकिर्तन सेवा प्रतिष्ठान व्दारा आयोजित केलेल्या स्व ग्राम ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास या वर्षीचा श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे वतीने देण्यात येणारा ” निर्मल वारी आदर्श दिंडी ” पुरस्कार २०२६ हा जाहीर झाला असून, हा पुरस्कार श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर येथील सभागृहात एका शानदार सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सौ.अमृताताई फडणवीस यांचे हस्ते आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्त औसेकर महाराज, हरिभक्त प्रकाश महाराज जवंजाळ, हरिभक्त शिवाजी महाराज मोरे, हरिभक्त माधवी ताई निगडे, हरिभक्त देशमुख महाराज, हरिभक्त नडगिरे ताई विश्वस्त यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला हा पुरस्कार पुजनीय हरिभक्त श्री सोनूने गुरूजी,सौ. सुमनबाई सोनुने दिंडीचे विणेकरी हरिभक्त दिनकर महाराज, प्रतिष्ठानचे विश्वस्त हरिभक्त शालीकराम पाटील म्हस्के ,विश्वस्त सुनील वायाळ यांनी स्विकारला आहे.
पुजनीय श्री साळूबा यशवंत सोनुने ऊर्फ सोनुने गुरूजी बाबा या नावाने प्रसिद्ध असलेलेले व्यक्तीमत्व असुन “महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक” पुरस्कार प्राप्त झाला आहे, सेवेत असतांनाच आणि शिक्षक सेवेच्या सेवानिवृत्ती नंतर आपले संपूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी समर्पित केलेले आहे यांनी आपल्या भागवत धर्माची पताका घेऊन आचरण करीत संताचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी वारकरी धर्मसंकिर्तन सेवा प्रतिष्ठान ची स्थापना केली असून या प्रतिष्ठान मध्ये जाफराबाद, भोकरदन आणि शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातील असे ३५ गावे सहभागी असुन या प्रतिष्ठानचे वतीने स्व ग्राम ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, श्री क्षेत्र आळंदी येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक गावात अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो, मुलांसाठी भागवत धर्म प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येते, संताची मांदियाळी,थोर समाजसुधारक, विचारवंत यांच्या जयंतीनिमित्त आणि पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन सारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. तसेच या प्रतिष्ठान चे वतीने संकष्टी चतुर्थी मंडळाच्या माध्यमातून सहभागी असलेल्या गावात फिरती संकष्टी चतुर्थी उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये गावांमध्ये संपूर्ण गावाची ग्रामस्वच्छता करण्यात येते, संपूर्ण गावात सडा, रांगोळ्या काढल्या जातात ठरलेल्या गावात सहभागी गावचे वारकरी जमा होऊन प्रदक्षिणा घालून हरिपाठ होतो शेवटी श्री हरि किर्तन होऊन संपूर्ण गावातील लोक एकत्र येऊन सहभोजन करून आनंद व्यक्त करतात . यावेळी व्यसनमुक्ती,सदाचार आणि सद्विचार याचा संकल्प केला जातो यामुळे या परीसरातील हजारो लोक व्यसनमुक्त जीवन जगत आहेत हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
या वर्षी यांचे वारकरी धर्मसंकिर्तन सेवा प्रतिष्ठानचे वतीने आयोजित स्व ग्राम ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास आयोजन केले जाते या दिंडी चे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कडक शिस्तबद्धता, अखंडपणे वारकरी भजन गात, प्रदुषण, प्लास्टिक मुक्त पर्यावरण पुरक व्यवस्था स्वच्छता अभियान राबवित हि दिंडीने समाजपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.दिंडीतील सर्व वारकरी बांधवांना एकच वेश आणि शिस्तीत लाईन मध्ये चालत, अखंडपणे भगवंताचे नाम स्मरण करत भजनांचा आनंद घेत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, दिंडी मुक्कामाचे ठिकाणाहून निघाल्यावर परीसराची स्वच्छता करण्यात येते, रस्त्याने चालतांना कचरा होणार नाही याची काळजी घेतली जाते, भोजनासाठी ताट, वाट्या, ग्लास याचा वापर केला जातो यामुळे प्लास्टिक पत्रावळी नसल्याने प्लास्टिक कचरा होत नाही, प्रदुषण होत नाही.
या वारकरी धर्मसंकिर्तन सेवा प्रतिष्ठान चे विश्वस्त हे सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी असुन हे सर्व जन तन, मन, धन पुर्वक या सेवा कार्यासाठी पुजनीय श्रीगुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असुन समाजाला योग्य दिशादर्शक देण्याचे काम अखंडपणे करीत आहेत.
या पुरस्काराचे माध्यमातून जालना जिल्ह्याचा बहुमान वाढला आहे आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी हि अभिमानास्पद बाब आहे.
या दिंडीचा आदर्श इतरांनी घेऊन भागवत धर्माची पताका अजून उंच व्हावी हि अपेक्षा आहे.










