“36 मिमी पावसातच महापालिकेची धावपळ; पूरस्थितीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!”
छत्रपती संभाजीनगर | दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क | दि. १ जुलै
छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि तळघरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नागरिकांना पूर व अतिवृष्टीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, विवेकानंद कॉलेज परिसरात वृक्ष कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. विजय नगर, न्यू हनुमान नगर, उल्कानगरी तसेच सिडको एन-३ परिसरातील तळघर आणि रस्त्यांवर पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त होताच अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरात दिवसभरात 36.08 मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, महापौर समीर राजुरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांनी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना सतर्क राहून नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महापालिकेने नागरिकांना नदी, नाले, पूल, सखल भाग आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाण्याचा वेग असलेल्या रस्त्यांवर वाहन चालवू नये, विद्युत तारा व खांबांपासून दूर राहावे, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
आपत्कालीन मदतीसाठी महानगरपालिका आपत्ती नियंत्रण कक्ष (0240-2617165 / 2617166), अग्निशमन नियंत्रण कक्ष (0240-2334000) तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 9823270782 वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.








