१६ कोटी खर्चूनही रस्त्यांची दुरवस्था; ४० हजार नागरिकांचे हाल
उपअभियंता इंगळे व सहाय्यक आयुक्त प्राजक्ता वंजारी यांच्याविरोधात नागरिकांचा संताप; आयुक्तांकडे निलंबनाची मागणी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
पावसाळा सुरू होताच चिकलठाणा परिसरातील हिनानगर येथील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत तब्बल १६ कोटी रुपये खर्च करून मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने नागरिकांना चिखल, खड्डे आणि घसरड्या रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील सुमारे ४० हजार नागरिकांचा एकमेव मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हिनानगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून पक्क्या रस्त्यांची मागणी सुरू आहे. अनेक आंदोलने व पाठपुराव्यानंतर स्मार्ट सिटी योजनेतून रस्ता मंजूर झाला; मात्र काम अर्धवट राहिल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होत आहेत, तर पायी चालणाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांनी महानगरपालिका झोन क्रमांक ५ मधील उपअभियंता इंगळे आणि सहाय्यक आयुक्त प्राजक्ता वंजारी यांच्यावर गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी नागरिकांचे फोन घेत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.







