नामांतर शहीद स्मारकाच्या निकृष्ट कामावर आंबेडकरी संघटनांचा संताप
संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील नामांतर शहीद स्मारकाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. २० जुलै २०२६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या तसेच १७ वर्षे नामांतराच्या लढ्यात आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे हे स्मारक अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मंजूर झाले. मात्र गेल्या चार वर्षांपासून स्मारकाचे काम संथ गतीने सुरू असून संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आंबेडकरी संघटनांनी यापूर्वीही निवेदने व आंदोलने करून या कामातील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर राहुल वडमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आमरण उपोषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणीत स्मारकाच्या बांधकामात गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दि. २९ जून २०२६ रोजी संबंधित ठेकेदार प्रियंका रोहित नावंदर यांना निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडून नव्याने मजबूत व दर्जेदार बांधकाम करण्याचे आदेश दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने केवळ काही भाग पाडून उर्वरित काम योग्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
तसेच या प्रकरणातील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे राहुल वडमारे यांना ठेकेदाराचे पती रोहित नावंदर व अजहर बाबर कुरेशी यांनी पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नामांतरासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या ऐतिहासिक विद्यापीठाची बदनामी होत असून बौद्ध, आंबेडकरी, संविधानवादी व समतावादी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून संपूर्ण निकृष्ट बांधकाम पाडून नव्याने दर्जेदार स्मारक उभारावे, अन्यथा विद्यापीठासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी दिपक निकाळजे, अरविंद कांबळे, अमित वाहूळ, प्रांतोष वाघमारे, सचिन निकम, राहुल वडमारे, राकेश कांबळे, नागेश केदारे, पवन पवार, मिलिंद दाभाडे, सचिन जोगदंड, सोनू नरवडे, कपिल बनकर, नंदू साळवे, जयश्री शिरके, सॅडी गुरु, संगीता जाधव, सतीश सुरडकर, प्रताप मोरे, रतन जाधव, अमोल गडवे, बंडू तांदळे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.







