जवाहरनगर पोलिसांची 12 तासांत धडाकेबाज कारवाई; अपहरण व मारहाण प्रकरणातील तिघे जेरबंद
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क तयार
जवाहरनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत अपहरण व मारहाण प्रकरणातील तीन आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक केली. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा थार कारही जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै 2026 रोजी फकीरचंद उर्फ मनीष शामसिंग महेर (वय 29, मूळ रा. मुळ पेंढापूर, ता. गंगापूर, सध्या अजबनगर, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास सिडको ब्रिजवरून क्रांती चौकाकडे रिक्षाने जात असताना सेव्हन हिल ब्रिजखाली महानगरपालिका बसस्टॉपजवळ दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी रिक्षा अडवून त्यांना खाली उतरविले. त्यानंतर काळ्या रंगाच्या महिंद्रा थारमधून आलेल्या उदय मोतीलाल भरमट उर्फ राजपूत, जावेद अमीन शेख, अनस अय्युब चाऊस व गुह अय्युब शेख यांनी जबरदस्तीने त्यांचे अपहरण करून देवगाव रंगारी येथे नेल्याचा आरोप आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, वाळू वाहतूक व कमिशनच्या पैशाच्या वादातून आरोपींनी त्यांना लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कपडे फाडून मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 302/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवाहरनगर पोलीस व गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने देवगाव रंगारी परिसरात छापा टाकून तीन आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा थार कार जप्त करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.







