दर्ग्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शहरातील हजरत शहीद शाद औझ साहिब दर्ग्याबाबत एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय उलेमा बोर्ड (महाराष्ट्र) आणि स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीने दर्गा परिसरात धार्मिक विधी पार पाडण्यात आले. यावेळी दर्ग्याला अत्तर व गुलाबपाणी अर्पण करून फुलांची चादर चढविण्यात आली तसेच फातिहा पठण करण्यात आले.
या प्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्व नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन उलेमा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच संबंधित वृत्तवाहिनीचे रिपोर्टर बी. एम. राठोड यांनी दर्ग्याबाबत दिशाभूल करणारी विधाने करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अखिल भारतीय उलेमा बोर्ड (महाराष्ट्र) चे राज्य सरचिटणीस मोहम्मद शहाबुद्दीन सूद आगर यांनी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, बेगमपुरा पोलीस ठाणे, महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत संबंधितांवर गुन्हा दाखल (एफआयआर) करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात संबंधित दर्गा हा वक्फ बोर्डात नोंदणीकृत असून त्याची नोंद अधिकृत गॅझेट तसेच उमीद पोर्टलवर उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दर्ग्याबाबत करण्यात आलेले दावे वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.
या प्रसंगी सय्यद सादत दर्ग्याचे विश्वस्त, सय्यद मुबीनुद्दीन, इम्तियाज अब्दुल जब्बार, अयुब खान, शेख अजीज, शेख अब्दुल शाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून आवश्यक पुरावे संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
(टीप : वरील वृत्त हे आयोजकांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातील दावे व आरोपांवर आधारित असून संबंधित वृत्तवाहिनी किंवा संबंधित व्यक्तीची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)







