२.३५ लाख घेतले, ताबा दिला; तरी त्याच जमिनीचे तिघांना खरेदीखत!
भाव वाढताच इरादा फिरला; न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही बीड बायपासवर व्यवहार, चौघांवर गुन्हा
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : जमिनीचे भाव वाढताच मूळ मालकाचा इरादा बदलल्याचा आरोप आहे. इसार व भरणा पावतीद्वारे एकूण २ लाख ३५ हजार रुपये स्वीकारून जमिनीचा ताबा दिल्यानंतरही त्याच जमिनीचे अन्य तिघांच्या नावे खरेदीखत नोंदवण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित जमीन विक्रीस न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही शासनाच्या नवीन नोंदणी नियमाचा गैरफायदा घेत गंगापूरचे रजिस्ट्री कार्यालय टाळून बीड बायपास येथील दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात शेख आयूब शेख गुलाब (५५, रा. देवळाई), अनिकेत सुभाष कनिसे (२४, रा. तिसगाव), बाळासाहेब माधव पवार (५८, रा. बजाजनगर, वाळूज) आणि लासूर स्टेशन येथील एका १८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार शेख जब्बार शेख अब्दुल (५४, रा. देवळाई) यांनी २०११ मध्ये गंगापूर तालुक्यातील गोळेगाव येथील गट क्रमांक २३ मधील १ हेक्टर ६३ आर शेतजमिनीचा शेख आयूब शेख गुलाब यांच्यासोबत खरेदीचा व्यवहार केला होता. त्यावेळी शेख जब्बार यांनी १ लाख ७५ हजार रुपये रोख देऊन इसार पावती करून घेतली. त्याच वेळी शेख आयूब यांनी जमिनीचा ताबाही दिल्याचा दावा तक्रारीत आहे. त्यानंतर शेख जब्बार यांनी जमिनीवर पत्र्याची शेड उभारल्याचेही नमूद आहे.
पुन्हा घेतले ६० हजार
त्यानंतर मुलीच्या लग्नाचे कारण सांगून शेख आयूब यांनी उर्वरित रकमेची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार ४ फेब्रुवारी २०१२ रोजी आणखी ६० हजार रुपये रोख देऊन भरणा पावती करून घेतली. अशा प्रकारे एकूण २ लाख ३५ हजार रुपये दिल्यानंतर खरेदीखत नोंदवून देण्याची विनंती करण्यात आली.
जमीन विक्रीस मनाई
खरेदीखत नोंदवून देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेख जब्बार यांनी २०१२ मध्ये न्यायालयात दावा दाखल केला. त्यानंतर २०१७ मध्ये संबंधित जमीन विक्री करण्यास मनाई करणारा न्यायालयीन आदेश जारी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
बीड बायपासवर रजिस्ट्री
शेख जब्बार यांनी २०२५ मध्ये जाहीर प्रगटन देऊन संबंधित जमिनीचा व्यवहार न करण्याचे आवाहन केले होते. तसेच गंगापूरच्या रजिस्ट्री कार्यालयात ‘नोटीस ऑफ लिस पेन्डेन्स’ संदर्भातील नोंदणीकृत अर्ज सादर केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
मात्र, नियमानुसार कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत नोंदविता येत असल्याच्या सुविधेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. गंगापूरचे कार्यालय टाळून बीड बायपास येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत नोंदवण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
१४ हजार १३ मालमत्तांची तालुका बदलून रजिस्ट्री
मालमत्तांची खरेदी-विक्री सुलभ करण्यासाठी शासनाने १ मे २०२५ पासून ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ सुविधा सुरू केली आहे. या सुविधेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तालुका बदलून तब्बल १४ हजार १३ मालमत्तांची नोंदणी झाल्याचे सांगण्यात येते.
वेळ, पैसा आणि श्रम वाचविण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरत असली, तरी काही जणांकडून तिचा गैरफायदा घेत वादग्रस्त मालमत्तांच्या व्यवहारात हेराफेरी केली जात असल्याचे प्रकार समोर येत असल्याचा दावा आहे.
या सुविधेमुळे जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्तेच्या खरेदीखताची नोंदणी करता येते. मात्र, संबंधित तालुक्यातील कार्यालय टाळून दुसऱ्या तालुक्यात वादग्रस्त मालमत्तांची नोंदणी करण्याचे प्रकार घडल्यास त्यातून फसवणुकीच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता आहे.
कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?
अॅड. सागर किल्लारीकर यांच्या मते, या सुविधेच्या अंमलबजावणीपूर्वी सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील मुद्रांक-नोंदणी कार्यालये मालमत्तांचे गट क्रमांक आणि सिटी सर्व्हेच्या याद्यांसह ऑनलाइन जोडणे आवश्यक आहे. अन्यथा योजनेचा उद्देश बाजूला पडून जनतेची फसवणूक होण्याची शक्यता आहे. सर्व मालमत्तांची नोंद आधार क्रमांकाशी जोडल्यास व्यवहारात पारदर्शकता वाढेल, असे त्यांनी म्हटले.
प्रभारी जिल्हा मुद्रांक अधिकारी आर. आर. रोडगे यांच्या माहितीनुसार, मुद्रांक शुल्कात तफावत आढळल्यास फरकाची रक्कम वसूल केली जाईल. ती रक्कम न भरल्यास ७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर बोजा नोंदविण्याची कारवाई केली जाऊ शकते.
बनावट व्यक्ती उभ्या करून खरेदी-विक्री?
१ मेपासून आतापर्यंत बनावट व्यक्ती उभ्या करून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांची खरेदी-विक्री झाल्याची सुमारे पाच ते सहा प्रकरणे शहरात उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणांचा पोलिस तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते.





