छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल !; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन !!
छत्रपती संभाजीनगर दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
शिंदे गटाची मराठवाडास्तरीय पदाधिकारी बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा या कार्यक्रमांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (८ सप्टेंबर) शहरात आले होते. त्यांच्यासाठी लावलेल्या बंदोबस्तामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पोलिसांनी चौक, उड्डाणपूल बंद केले. त्यामुळे नागरिक वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी संताप व्यक्त केला. याचदरम्यान एका वकील महिलेसोबत बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचाही प्रकार घडला. शिंदे गटाचे १२ आमदार, ३ मंत्री, आठ जिल्हाप्रमुख व ५० पेक्षा अधिक तालुकाप्रमुख शहरात आले होते. त्यांच्यासाठी १ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
छ. संभाजीनगरात मंत्र्यांचा प्रोटोकॉल, नागरिकांचे हाल!; बंदोबस्तातील पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला वकिलासोबत गैरवर्तन !!
सामान्यजन कळवळले…
मंत्र्यांची बडदास्त ठेवताना चौक, उड्डाणपूल बंद केले. त्यामुळे दुपारपासून जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सिडको बसस्थानक ते सेव्हन हिल्स, मोंढा नाका, अमरप्रीत चौकात वाहनांची प्रचंड कोंडी झाली. रुग्णवाहिकाही अडकल्या. संत एकनाथ रंगमंदिरासमोर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच वाहने उभी केली होती. त्यामुळे तिथेही वाहतूक कोंडी झाली. हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर नेते, पदाधिकाऱ्यांची वाहने जालना रोडवरच उभी केलेली होती. त्यामुळे रात्री ९ पर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला.
गैरवर्तनाचा काय प्रकार…
अॅड. निकिता नारायणराव गोरे या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केंद्र सरकारच्या वकील आहेत. त्यांची कार हॉटेल रामाजवळ बंद पडली. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने पोलिसांनी चौक बंद केले. व्हीआयपी मूव्हमेंटमध्ये वाहन भररस्त्यात कसे बंद पडले? आपण मद्य प्राशन केले का? आपली वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी अॅड. गोरे यांना सुनावले. त्यांनी कारवर काठ्या मारून अरेरावी केल्याचा आरोप अॅड. गोरे यांनी केला.
त्यामुळे संतप्त अॅड. गोरे यांनी या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठले. मात्र पुंडलिकनगर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने अॅड. गोरे यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडण्याची भूमिका घेतली. त्यानंतर तक्रार लिहून द्या, असे म्हणत पोलीस नरमले. गुन्हा दाखल न करण्याबाबत पोलिसांनी सांगितले, की वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायचा असल्यास परवानगी घ्यावी लागते. प्रथम तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी लागते.