पैठण हादरले : मस्तवाल अधिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी!; रस्तेकामामुळे शेतात पाणी साचत असल्याचे सांगत असलेल्या शेतकऱ्याला धारेवर धरले
पैठण: दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
पैठण तालुक्यातील खादगाव येथे अधिकाऱ्यांच्य मस्तवालपणामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. खादगाव ते खर्डा रस्ताकामामुळे शेतात पाणी साचल्याची तक्रार शेतकऱ्याने महसूल विभागाकडे केली होती. मंडळ अधिकारी आणि तलाठी पाहणीसाठी आले असता त्यांनी दिलासा देण्याऐवजी शेतकऱ्यालाच मस्तवालपणे बोलायला सुरुवात केली. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने त्यांच्यासमोरच थेट विहिरीत उडी घेऊन जलसमाधी घेतली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१६ सप्टेंबर) दुपारी अडीचला घडली. संजय शेषराव कोहकडे (वय ४५, रा. खादगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मस्तवालपणे बोलून अपमानित करत असल्याने शेतकरी कोहकडे हे उद्विग्न झाले. त्यांनी अधिकाऱ्यांसमोरच पळत जाऊन शेजारील विहिरीत उडी घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनीही त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उड्या टाकल्या.
कोहकडे यांना विहिरीबाहेर काढून पाचोड शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉ. प्रकाश साबळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कोहकडे यांच्याकडे पाच-सहा एकर शेती आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ आणि अधिकारीही हादरून गेले. संतप्त नातेवाइकांनी दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. पाचोड पोलिसांनी त्यांची समजूत काढून कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी ७ ला मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. पाचोड पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पावसामुळे रस्त्याचे काम बंद झाले. रस्त्यालगत संजय कोहकडे यांचे शेत आहे. शेताच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम झालेले असल्याने पावसाचे पाणी कोहकडे यांच्या शेतात साचून पिकांचे नुकसान झाले. कोहकडे यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. मंगळवारी दुपारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी बालानगर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे घटनास्थळी आले. कोहकडे हे त्यांच्यासमोर व्यथा मांडत असताना दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना सुनावत अपमानास्पद बोलायला सुरुवात केली. आधीच झालेले नुकसान, त्यात दिलासा देण्याऐवजी हे दोन्ही अधिकारी मस्तवालपणे बोलून अपमानित करत असल्याने शेतकरी कोहकडे हे उद्विग्न झाले. त्यांनी अधिकाऱ्यांसमोरच पळत जाऊन शेजारील विहिरीत उडी घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनीही त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उड्या टाकल्या.
[17/09, 9:56 am] shabdmat: दोन्ही अधिकारी वादग्रस्त
दरम्यान, बालानगर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे दोन्ही अधिकारी वादग्रस्त असून, शेतकऱ्यांची कामे रखडवणे, वारंवार चकरा मारायला लावणे, असभ्य शब्दांत बोलणे यामुळे शेतकरी, ग्रामस्थांत त्यांच्याबद्दल रोष आहे. आताच्या घटनेने त्यांच्या कृत्याने कळस केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे म्हणाल्या, की तहसील कार्यालयाच्या आदेशावरून मी स्वतः खादगावला गेले होते. तेथे शेतकऱ्यांशी चर्चा करत होते. अचानक संजय कोहकडे यांनी जवळच असलेल्या विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मी स्वतः पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार व पाचोड पोलिसांना दिली.