पिंपळवाडी–महालब्बा रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न; ग्रामस्थांची चौकशीची मागणी..
. दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग
…
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या पिंपळवाडी–महालब्बा रस्त्याच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकृत माहितीनुसार या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मे. एस.आर.एल. कन्स्ट्रक्शन प्रा. लि., जालगाव यांच्याकडे २०२८ पर्यंत आहे. मात्र देखभाल कालावधी सुरू असतानाच रस्त्यावर काही ठिकाणी खडी उघडी पडल्याचे व डांबरीकरण निकृष्ट झाल्याचे आरोप होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून दुचाकीस्वारांमध्ये अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात रस्त्याची स्थिती आणखी खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि प्रत्यक्ष डांबरीकरणाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याबाबत तक्रारी समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “२०२८ पर्यंत देखभालीची जबाबदारी असताना २०२६ मध्येच रस्ता खराब कसा?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







