गुन्हा दाखल, पोलीस जंगजंग पछाडताहेत, हे माहीत असूनही ३ लाखांची हाव नडली, बेरोजगारांना गंडवणारा भामटा क्रांती चौकात जेरबंद !
छत्रपती संभाजीनगर
- दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १५ बेरोजगारांना ४९ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याच्या सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात सोमवारी (८ सप्टेंबर) मध्यरात्री १२ ला मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे, पोलिसांनी सापळा रचताना बेरोजगार बोलत असून, ३ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. गुन्हा दाखल होऊनही हाव न संपल्याने भामटा भरत दीनानाथ वाहूळ (रा. गौतमनगर, शासकीय दूध डेअरीसमोर, छत्रपती संभाजीनगर) जाळ्यात अडकला. त्याच्याकडे मंत्रालयातील एका खात्याचे कोरे लेटर पॅड आणि छत्रपती संभाजीनगर, सातारा, जालना, बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्के व बोगस नियुक्तीपत्रे मिळून आली आहेत.
विश्वास बसावा म्हणून त्याने शंभराच्या बॉण्डवर उसनवार पैसे घेत असल्याचे लिहून दिले. काहींना कोरे धनादेशही दिले. वाहूळने फसवल्याचे लक्षात आल्यावर काही युवकांनी धनादेश वटवण्यासाठी बँकेत जमा केले असता ते बाउन्स झाले. बेरोजगार युवकांनी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे तक्रार दिली. त्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले होते. वाहूळने चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून बनावट नियुक्तीपत्रे वाटली. नियुक्तीपत्र मिळाल्याने युवक नोकरीच्या ठिकाणी गेले असता ते नियुक्तीपत्र बोगस असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचा आनंद क्षणात मावळला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे करत आहेत.
काय आहे प्रकरण…
या प्रकरणात भरत दीनानाथ वाहूळ आणि त्याचा साथीदार अंकुश रामलाल पवार (रा. गेवराई तांडा, छत्रपती संभाजीनगर) अशा दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (८ सप्टेंबर) रात्री आठला गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध साहेबराव विठ्ठल वाघमोडे (४२, रा. शिंदेफळ, ता. सिल्लोड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली असून, त्यांच्यासह इतर १४ जणांना वाहूळने गंडा घातल्याचे म्हटले आहे. ९ डिसेंबर २०२३ ते २ डिसेंबर २०२४ या काळात त्याने सिल्लोड तालुक्यातील १५ बेरोजगार युवकांना हेरून जिल्हाधिकारी कार्यालयांसह विविध खात्यांत लिपिक पदाच्या जागा निघाल्या असून, तेथे, तुम्हाला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. प्रत्येक युवकाकडून १० ते १३ लाख रुपये घेतले.
विश्वास बसावा म्हणून त्याने शंभराच्या बॉण्डवर उसनवार
पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे, पोलीस अंमलदार रमेश व्यवहारे, विठ्ठल नागलोद यांनी भरत वाहूळला पकडण्यासाठी सापळा रचला. एका बेरोजगार व्यक्तीच्या नावाने कॉल करून बाकी राहिलेले ३ लाख रुपये कुठे आणून द्यायचे, अशी विचारणा केली. गुन्हा दाखल झाला आहे, पोलीस आपल्याला जंग जंग पछाडत आहेत, हे माहीत असूनही भरत वाहूळ या ३ लाखांच्या मोहात अडकला अन् सोबतच पोलिसांच्या जाळ्यातही… तो क्रांती चौकात येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस सूत्रांनी सांगितले, की वाहूळ आधी प्राध्यापक म्हणून एका शिक्षण संस्थेत नोकरीला होता. त्यानंतर आरटीओ कार्यालयातील भंगार वाहने घेण्याचे काम करू लागला. नंतर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तो बेरोजगारांकडून पैसे उकळू लागला. यासाठी तो आपली मंत्रालयात ओळख आहे, असे सांगत होता.
