महसूल विभागाचा ‘गांधीगिरी’ की जबाबदारीतून पळ? तहसीलदार गैरहजर; कडेठाणमध्ये संताप उसळला
पैठण (प्रतिनिधी) दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
तालुक्यातील गेवराई मर्दा – कडेठाण खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमीन गट क्रमांक २३/२४ मधील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून, तहसीलदारांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आज सकाळपासून ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र जमले होते. या कारवाईसाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि अधिकृत आदेश अपेक्षित असताना, दुपार उलटूनही पैठण तहसीलदार घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
प्रशासनावर दिरंगाईचे आरोप
ग्रामस्थांच्या मते, शासन एकीकडे अतिक्रमण हटवण्याचे आदेश देत असताना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहतात. “अधिकारी सुट्टीवर आहेत की कर्तव्यात कसूर करत आहेत?” असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
लोकप्रतिनिधींचा सवाल
“आम्ही नियमाप्रमाणे कारवाईची मागणी करत आहोत, मात्र महसूल विभाग कोणाला पाठीशी घालत आहे?” असा थेट प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
परिस्थिती तणावपूर्ण
तहसीलदारांच्या अनुपस्थितीमुळे घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण झाले असून, अधिकारी येईपर्यंत जागा न सोडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
मोर्चाचा इशारा
“प्रशासन सामान्य जनतेला वेठीस धरत आहे. आजच कारवाई झाली नाही, तर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणात आता जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पैठण तहसीलदार यावर काय स्पष्टीकरण देतात आणि रखडलेली कारवाई पूर्ण होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








