आंबेडकर जयंतीदिनी 14 हरवलेले मोबाईल परत; जवाहर नगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
- छ संभाजीनगर प्रतिनिधी राजेंद्र ओढेकर
छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती (दि. 14 एप्रिल 2026) निमित्ताने जवाहर नगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत चोरीला गेलेले व हरवलेले तब्बल 14 महागडे मोबाईल नागरिकांना परत दिले. सुमारे 3 लाख 30 हजार रुपयांच्या किमतीचा हा मुद्देमाल सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या सहाय्याने ट्रेस करून विविध राज्यांतून जप्त करण्यात आला.
ही कारवाई बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील ठाणे, नांदेड, नाशिक आणि मुंबई या ठिकाणांहून करण्यात आली. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना मोबाईल परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत जवाहर नगर पोलिसांचे आभार मानले.
तक्रारदारांपैकी काहींनी आपले अनुभव व्यक्त केले. एका तक्रारदाराला त्याच्या वडिलांनी वाढदिवसाला मोबाईल भेट दिला होता, तर दुसऱ्याने मोबाईल हप्त्यांवर (EMI) घेतला होता. काहींनी मेहनतीच्या पैशातून मोबाईल खरेदी केला होता. त्यामुळे मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या भावना व्यक्त झाल्या.
पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवावी, जेणेकरून शोधकार्य अधिक प्रभावीपणे करता येईल.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी (परिमंडळ-०२), सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी या प्रकरणात उत्कृष्ट कामगिरी बजावली.
—
दैनिक शब्दमत – महाराष्ट्राचा बुलंद आवाज









