विशेष वार्ता | दैनिक शब्दमत
गोदावरी नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा; प्रशासनावर सवाल
पैठण (प्रतिनिधी) – पैठण तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हिरडपुरी परिसरातील वाळू घाटावर दिवस-रात्र सुरू असलेल्या या अवैध कारभारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सुमारे 100 ते 200 हायवा व ट्रकद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक वाहने विनानंबर किंवा नियमांचे उल्लंघन करत खुलेआम फिरताना दिसत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हिरडपुरी येथील शासकीय वाळू घाटावर रॉयल्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विना रॉयल्टी वाळू वाहतूक होत असून शासनाला लाखो रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे. काही स्थानिक अधिकाऱ्यांकडून वाळू तस्करांना अभय दिले जात असल्याचीही कुजबुज गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.
या अवैध वाळू उपशामुळे नदी पात्र दिवसेंदिवस खोल होत असून भूजल पातळी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शेती, पूल आणि परिसरातील पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणाची माहिती असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप तहसील प्रशासनावर होत आहे. तसेच विना नंबर धावणाऱ्या हायवा वाहनांवर पाचोड पोलीस ठाणे यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“कारवाई कधी होणार?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








