जालना रोड ते सांगवी बायपास रस्त्याचे काम ठप्प; पावसाळ्यापूर्वी तत्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
आजमत पठाण यांची विशेष रिपोर्ट
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – शहरातील जालना रोड ते सावंगी बायपास दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत थांबल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या सुमारे शंभर कोटींच्या निधीतून या मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यातील काही भाग पूर्ण करून उर्वरित काम ठेकेदाराने सोडून दिल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेषतः हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगर परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फटका बसत असून, पावसाळा तोंडावर आलेला असताना रस्ता पूर्ण न झाल्यास नागरिकांना चिखलातून ये-जा करावी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षभरापासून या मार्गावर काम सुरू होते, परंतु सध्या ते पूर्णपणे ठप्प झाले आहे.
महानगरपालिकेकडून सुमारे चार कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात काम अपूर्ण ठेवून ठेकेदाराने बिल उचलल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे तक्रारी देखील सादर केल्या आहेत.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांनी अनेक वर्षांपासून विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. रस्ते, स्ट्रीट लाईट आणि आरोग्य सेवांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“पावसाळ्यापूर्वी जालना रोड ते सावंगी बायपास रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ सुरू करून पूर्ण करावे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी दैनिक शब्दमतशी बोलताना व्यक्त केली. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन काम पुन्हा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.








