अपहरण व खंडणी प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयातून जामीन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | दैनिक शब्दमत
अपहरण, मारहाण व खंडणीच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी हा आदेश पारित केला.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ९३/२०२६ अंतर्गत आरोपी रमेश्वर उर्फ रमेश काळे याच्यावर अपहरण, मारहाण व खंडणीचे आरोप ठेवण्यात आले होते. तक्रारदाराचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली तसेच त्याच्याकडील रोख रक्कम व सोन्याची अंगठी हिसकावून घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
घटनेचा तपशील
१५ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार चिकलठाणा येथील शेतातून परतत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी डोळे बांधून त्यांना त्यांच्या स्वतःच्या कारमधून अज्ञात ठिकाणी नेले. तेथे मारहाण करून पैशांची मागणी करण्यात आली. आरोपींनी तक्रारदाराकडील ८०० रुपयांची रोकड आणि सुमारे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदाराला बदनापूर तालुक्यातील किनगाव फाटा येथे सोडून देण्यात आले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी रमेश्वर काळे यास जामीन मंजूर केला.
- या प्रकरणात बचाव पक्षातर्फे अॅड. डॉ. अनघा पेडगांवकर यांनी बाजू मांडली.








