मंत्री सावेंचे ओएसडी कारंडेंवर पत्नीच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप; मुलालाही मारहाण
दैनिक शब्दमत ♦♦छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
राज्य सरकारमधील मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्याशी संबंधित धक्कादायक प्रकरण समोर आले असून, या घटनेमुळे राज्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच लहान मुलालाही बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप कारंडे यांच्यावर करण्यात आला आहे.
समोर आलेल्या छायाचित्रे व प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिलेला गंभीर दुखापत झाली असून मुलालाही मारहाणीमुळे इजा झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारचे हिंसक कृत्य घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांकडूनच अशा प्रकारचे प्रकार घडणे अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर या घटनेच्या पार्श्वभूमीवर नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे. या घटनेमुळे राज्यातील प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.








