जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका) : येत्या पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीत जिरवून प्रत्येक पाणलोट क्षेत्राचा विकास करावा. जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यासाठी सज्जता ठेवावी, असे निर्देश विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता श्रीमती एम. जी. नांद्रे, सहायक पशु आयुक्त डॉ. आर. डी. इंगळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश सिंगारे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनिषा हराळ-मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचाही आढावा घेतला. जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्यासाठी विविध जलसंधारण उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यामध्ये समतल चर, शोष खड्डे, बंडिंग, भूमिगत रिचार्ज शाफ्ट, लहान बंधारे, नाला खोलीकरण तसेच विहिरींचे पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. विविध विभागांमार्फत या उपाययोजना राबविल्या जात असून जलयुक्त शिवार अभियानातील कामांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक पाणलोट क्षेत्रात पाणी अडवून त्या भागाचा विकास साधणे आवश्यक असल्याचे सांगत, “पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याचा निर्धार आपण केला पाहिजे,” असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले. तसेच ‘जलसंचय जनभागीदारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.







