: Nashik Kumbha Mela : कुंभमेळा
कामांत स्थानिकांनाही संधी, पावणेदोनशे कोटींची बचत… मनपा आयुक्तांनी कोणाला उत्तर दिले?
नाशिक दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
नाशिक मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या कामांची निविदा प्रक्रिया अवघ्या दीड महिन्यात पूर्ण करून दीडशे ते पावणे दोनशे कोटींची बचत केल्याचा दावा केला असून, स्थानिक कंत्राटदारांना डावलल्याचा आक्षेप अप्रत्यक्षपणे खोडून काढला आहे.
: गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या सुमारे सहा हजार कोटींच्या कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये महानगरपालिकेचे रस्ते, पूल, जलशुध्दीकरण प्रकल्प, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रामकाल पथ, ऑप्टीकल फायबर आणि सीसी टीव्ही प्रकल्प आदींचा समावेश आहे.
कुंभमेळ्याची छोटी, छोटी कामे एकत्रित करून बड्या ठेकेदारांना दिली गेली, यातून स्थानिकांना डावलण्यात आल्याचा आरोप ठेकेदार संघटनांसोबत शिवसेनेकडून (शिंदे गट) अनेकदा केला गेला. शिवाय, कुंभमेळ्यांच्या कामांना विलंब झाल्याची ओरड होत आहे. हे आक्षेप मनपा आयुक्त खत्री यांनी अप्रत्यक्षपणे खोडून काढले.
नाशिक – प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पूल, सांडपाणी
प्रक्रिया केंद्र, पाणी पुरवठा योजना, रस्ते आदी कामांची निविदा प्रक्रिया राबवून दीड महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले. संपूर्ण भारतात कुठेही होत नाही, तितक्या जलदगतीने काम नाशिकमध्ये करण्यात आले. या प्रक्रियेसाठी कुठेही साधारणत चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. वाटाघाटीद्वारे वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत सुमारे दीडशे ते पावणे दोनशे कोटींची बचत करण्यात आल्याचा दावा मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी केला आहे.
जल शुध्दीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, ऑप्टीकल फायबर, सीसी टीव्ही यंत्रणा आदी सर्व कामे सहा ते आठ टक्के कमी दराने देण्यात आली. केवळ रस्ते कामात सरासरी १६ टक्के कमी दर पकडले तरी १५० ते १६० कोटींची बचत झाल्याकडे आयुक्त खत्री यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा
VIDEO : लग्नाच्या स्वागत समारंभातच नवरदेवावर हल्ला; थरारक घटना ड्रोन कॅमेरात कैद…
इतर कामांमध्ये वाटाघाटीद्वारे मोठी बचत झाल्याचा दावा त्यांनी केला. वाचलेल्या निधीचा विनियोग नाशिककरांसाठी केला जाईल. पुढील वर्षी महापालिकेत लोकप्रतिनिधी येतील. त्याच्या मागणीनुसार नियोजन करण्यात निधीचा उपयोग होऊ शकेल. कुंभमेळ्याच्या कामांना विलंब झाल्याची धारणा पसरली असली तरी वास्तव तसे नाही. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी उपरोक्त प्रक्रिया आधी पूर्णत्वास गेल्या आहेत. सर्व कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर त्यांच्या चाचण्या व तत्सम प्रक्रिया पार पडतील, असे आयुक्त खत्री यांनी सूचित केले.
