निधी मंजुरीसाठी लाच प्रकरण : मंत्रालयातील कक्ष अधिकारी ६.३७ लाखांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अटक
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
मुंबई/खारघर : राज्यातील मंत्रालयात पुन्हा एकदा लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले असून अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. खारघर परिसरात रचलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात निधी मंजुरीसाठी विलास लाड याने तक्रारदाराकडून लाखो रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर अधिकाऱ्यांविरुद्ध सापळा रचण्यात आला. त्यानुसार खारघर येथे लाड याला तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची रोकड स्वीकारताना पकडण्यात आले.
विलास लाड हा मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असून हा विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मंत्रालयात लाचखोरीचे हे दुसरे प्रकरण असून काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मंत्रालयातील अधिकारी लाच घेताना सापडल्याने शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एसीबीने आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी केली जात आहे.











