डिझेल टंचाई आणि दरवाढीने जाफराबाद तालुक्यातील बळीराजा हवालदिल
ऐन खरिपात मशागतीची कामे ठप्प; ट्रॅक्टर सोडून पुन्हा बैलजोडी जोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ
दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी प्रतिनिधी : मोहम्मद बाईयाश
“जय जवान, जय किसान “च्या घोषणा देणारे सरकार प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे काय? असा संतप्त सवाल जाफराबाद तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. मागील काही दिवसांपासून तालुक्यात डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ट्रॅक्टरला डिझेल मिळावे यासाठी शेतकऱ्यांना पेट्रोलपंपावर तासन्तास रांगा लावाव्या लागत असून अनेकदा “डिझेल संपले” हेच उत्तर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सध्या पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामासाठी नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर, पेरणीपूर्व मशागत, पाण्याच्या मोटारींची
दुरुस्ती आणि फवारणी यंत्रांची तयारी वेगाने सुरू आहे. जाफराबाद तालुक्यातील सुमारे ८० टक्के शेती यांत्रिकीकरणावर आधारित असून ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पंप, जनरेटर आणि फवारणी यंत्रांसाठी डिझेल अत्यावश्यक आहे. मात्र, डिझेल उपलब्ध होत नसल्याने अनेक ट्रॅक्टर मालकांनी आपली वाहने
शेतातच उभी केली आहेत.
मशागतीची कामे ठप्प काही गावांमध्ये ट्रॅक्टर बंद पडल्याने पुन्हा बैलजोडीच्या साहाय्याने शेती कसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आधुनिक शेतीकडून पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळण्याची वेळ आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील
66
नेते डिझेल टंचाईवर मौन “निवडणुका आल्या की
शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखविणारे नेते आता मात्र डिझेल टंचाईवर मौन बाळगून आहेत. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, हे आता केवळ भाषणापुरतेच उरले आहे काय? डिझेलअभावी शेतीची कामे थांबत असताना शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.”
अशोक पवार, प्रगतिशील शेतकरी
अनेक पेट्रोलपंपांवर सकाळपासूनच ट्रॅक्टर व दुचाकींच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. काही शेतकरी पहाटेपासूनच डिझेल मिळेल या आशेने थांबत आहेत, मात्र तासन्तास प्रतीक्षा करूनही डिझेल संपल्याचे सांगण्यात येत असल्याने संताप वाढत आहे. शहरांमध्ये इंधन सहज उपलब्ध
असताना ग्रामीण भागाला कृत्रिम टंचाई निर्माण करून वेठीस धरले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पूर्वीच खतांच्या वाढलेल्या किमती, बियाण्यांचा वाढता खर्च, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, विजेची अनियमितता आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आता डिझेलच्या टंचाईमुळे शेतीच्या कामांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून पेरणी उशिरा झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. याच संकटात भर म्हणून १५ मे २०२६ पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ३.११ ते ३.१४ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इंधन कंपन्यांनी चार वर्षांनंतर ही दरवाढ
केली असली तरी याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. या परिस्थितीवर बोलताना युवा प्रगतिशील शेतकरी योगेश वारे यांनी संताप व्यक्त केला. शेतकरी हा देशाचा कणा असताना शासनाकडूनच दुर्लक्ष होत असेल तर यापेक्षा मोठे दुर्भाग्य नाही, सरकारने आम्हीही शेतकऱ्यांचीच लेकरे आहोत ही भावना ठेवून शेतकऱ्यांची कुचंबणा थांबवावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या डिझेल टंचाईमुळे केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असून ट्रॅक्टर चालक, शेतमजूर, फवारणी यंत्र चालक आणि वाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर हवालदिल झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







