रस्ता प्रकरणाकडे तहसीलदार ज्योती पवार, मंडळाधिकारी व तलाठी यांचे दुर्लक्ष? संतप्त शेतकऱ्याचे आमरण उपोषण
वारंवार अर्ज, मोजणी अहवाल व निवेदने देऊनही कार्यवाही नसल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी.
पेठण | प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
पेठण तालुक्यातील तांडा खुर्द येथील शेतकरी भाऊसाहेब माणिकराव घनवट यांनी शेतरस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी पेठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. महसूल प्रशासनाकडे वारंवार अर्ज, निवेदने, मोजणी अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, तहसीलदार ज्योती पवार, संबंधित मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना न्याय मिळालेला नाही. शेतात जाण्यासाठीचा रस्ता अद्याप मोकळा करण्यात आलेला नसल्याने शेतीची कामे खोळंबली असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला.
उपलब्ध कागदपत्रांनुसार, महसूल विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे भाऊसाहेब घनवट यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी तसेच निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.









