बीड जिल्ह्यातील दुर्दैवी दुर्घटना.. हायवाच्या धडकेनंतर कारने घेतला पेट, माय-लेकराचा होरपळून हृदयद्रावक अंत.. अहिल्यानगर राज्य महामार्गावरील कापसी फाटा येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी एक भीषण दुर्घटना घडली…
बीड दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
खडीने भरलेल्या एका भरधाव हायवा टिपरने कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने कारने भीषण पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत कारमधील ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय 26) आणि त्यांच्या आई पुष्पा श्रीहरी पुरी (वय 50) या माय-लेकरांचा जागीच होरपळून दुर्दैवी अंत झाला…
हे कुटुंब मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील असून सध्या केज तालुक्यातील साळेगाव तद्नंतर आष्टी येथे स्थायिक होते. नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी जात असताना काळाने त्यांच्यावर हा क्रूर घाला घातला. धडक इतकी तीव्र होती की इंधनाचा भडका उडून कार काही क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली, ज्यामुळे दोघांनाही बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही….
स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीच्या रौद्र रूपामुळे त्यांचा बचाव करणे अशक्य झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे….








